कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात दोन जण निरीक्षणाखाली


कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात दोन जण निरीक्षणाखाली


मुंबई - कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर सध्या राज्यात दोन जण निरीक्षणाखाली आहेत. तर आतापर्यंत ८३ प्रवाशांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज येथे दिली.


आतापर्यंत मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर ५० हजार ०९१ प्रवासी तपासण्यात आले आहेत. केंद्र सरकारच्या नवीन सूचनेनुसार चीन, हाँगकाँग, थायलंड, सिंगापूर, दक्षिण कोरिया, जपान यासोबत नेपाळ, इंडोनेशिया, व्हिएतनाम आणि मलेशिया या देशातील प्रवाशांची तपासणीही विमानतळावर करण्यात येत आहे.


बाधित भागातून आलेल्या प्रवाशांचा शोध क्षेत्रीय सर्वेक्षणातूनही घेण्यात येत आहे. आजपर्यंत राज्यात बाधित भागातून २९४ प्रवासी आले आहेत. त्यापैकी २१६ प्रवाशांचा १४ दिवसांचा पाठपुरावा पूर्ण झाला आहे.


 दि. १८ जानेवारीपासून ताप, सर्दी, खोकला अशी लक्षणे आढळल्याने राज्यातील वेगवेगळ्या विलगीकरण कक्षात ८५ जणांना भरती करण्यात आले होते. त्यापैकी ८४ जणांचे प्रयोगशाळा नमुने करोना करिता निगेटिव्ह आले आहे. ८५ प्रवाशांपैकी ८३ जणांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. सध्या मुंबई व पुणे येथे प्रत्येकी १ जण भरती आहे.