ज्ञान हीच संजीवनी असून जीवनात ज्ञानाचे भुकेले असाल तरच जीवनात यशस्वी व्हाल - अशोकराव थोरात


ज्ञान हीच संजीवनी असून जीवनात ज्ञानाचे भुकेले असाल तरच जीवनात यशस्वी व्हाल - अशोकराव थोरात


कराड - जीवनात प्रत्येक व्यक्तीने कायमस्वरूपी विद्यार्थी राहिली पाहिजे. ज्ञानाचे भुकेले असले पाहिजे. ज्ञान आयुष्यभर घेत रहा ते कधीच संपत नाही. शिक्षण क्षेत्रात नवनवीन आव्हाने येत आहेत. समाजात गरीब-श्रीमंत दरी वाढत चालली आहे. ती कमी करण्याचे काम पदवीप्राप्त स्नातकांना केले पाहिजे. असे प्रतिपादन मळाई देवी शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शेतीमित्र अशोकराव थोरात यांनी व्यक्त केले.


घोगाव (ता. कराड) येथील श्री संतकृपा शिक्षण संस्थेच्या श्री संतकृपा कॉलेज ऑफ फार्मसी व शिक्षणशास्त्र महाविद्यालयातील पदवीप्राप्त विद्यार्थ्यांना शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर अंतर्गत पदवीप्रदान समारंभ फार्मसी महाविद्यालयात नुकताच संपन्न झाला. अशोकराव थोरात यांच्या हस्ते स्नातकांना पदवी प्रदान करून गौरविण्यात आले. भारती विद्यापीठ कॉलेज ऑफ फार्मसी चे प्राचार्य डॉ. एच.एन.मोरे यांची विशेष उपस्थिती होती. संस्थेचे सचिव प्रसून जोहरी अध्यक्षस्थानी होते. मलकापूरचे नगरसेवक अजित थोरात, भारत जंत्रे उपस्थित होते.


अशोकराव थोरात म्हणाले, सध्या देश  संकटात आहे. महिलाही सुरक्षित नाहीत. समाजात चारित्र्य, नीतिमत्ता संपत चालली आहे. यासाठी येथून बाहेर पडणार्‍या विद्यार्थ्यांची सामाजिक बांधिलकी महत्त्वाची आहे. समाजात चारित्र्य,बंधुता,समता, नीतिमत्ता जोपासली पाहिजे यासाठी यापुढे विद्यार्थ्यांना लढावे लागेल.


प्राचार्य  डॉ. एच.एन.मोरे म्हणाले, तुम्ही पदवी प्राप्त केली आहे. यापुढे तुमचे ज्ञान समाजासाठी उपयोगी पडेल याची काळजी घ्या. तरच आपण खरे ज्ञान आत्मसात केलेअसे वाटेल. ज्ञानाने शहाणे होतो .पण हे शहाणपण वास्तव जीवन जगताना वापरणे महत्त्वाचे आहे. जीवनात जिद्द, चिकाटी ,संयम अतिशय महत्त्वाचे आहे. मात्र आजच्या तरुणात ती कमी दिसते ही शोकांतिका आहे. नेहमी चांगल्या गोष्टीचे अनुकरण करा तरच जीवन यशस्वी होईल.  सचिव प्रसून जोहरी म्हणाले, पदवी प्राप्त विद्यार्थ्यांना त्यांच्या पुढील वास्तववादी जीवनासाठी सर्वच क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी शुभेच्छा दिल्या.


सचिन पाटील यांनी प्रमुख अतिथींचा परिचय करून दिला. प्रास्ताविक  प्राचार्य डॉ. विजयानंद  अरलेलीमट यांनी केले. भाग्येश जानुगडे यांनी नियोजन केले. प्रियांका थोरात यांनी सूत्रसंचालन तर सचिन पाटील यांनी सर्व आभार मानले.