कराड - आपल्या स्वतःच्या आणि आपल्या कुटूंबियांच्या सुरक्षीततेसाठी वाहन चालकांनी वाहतूकीचे नियम कटाक्षाने पाळा, असे आवाहन तळबीड पोलिस ठाण्याच्या सहाय्यक पोलिस निरीक्षक जयश्री पाटील यांनी केले. सह्याद्रि सहकारी कारखाना कार्यस्थळावर, ऊस वाहतूकीच्या वाहनांना रिप्लेक्टर लावण्याच्या कार्यक्रमाप्रसंगी बोलत होत्या.
पाटील पुढे म्हणाल्या, सह्याद्रि सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आमदार बाळासाहेब पाटील हे नेहमीच वाहतूकीच्या नियमांचे काटेकोर पालन करण्यासाठी आग्रही असतात,
त्यांच्या मार्गदर्शनाखाली सह्याद्रिच्या वाहनांना रिप्लेक्टर लावले जातात, त्यामुळे सह्याद्रिच्या ऊस वाहतूकीच्या वाहन मालकांना जास्त नियम सांगावे लागत नाहीत, परंतू तरीही प्रत्येकाने जबाबदारीने वाहन चालवावे, प्रवासादरम्यान वाहन चालकाने टेप रेकॉर्डर, मोबाईल आदिंचा वापर टाळावा आणि वाहनांच्या वेग मर्यादेचे भान ठेवावे व अपघात होवूच नयेत म्हणून काळजी घ्यावी. तसेच राष्ट्रीय महामार्गावरून प्रवास करताना, उपलब्ध असलेल्या सेवा रस्त्यांचाच वापर करावा. दुचाकीस्वारांनी नेहमीच हेल्मेटचा वापर करावा व वाहन चालविताना मोबाईलवर बोलणे टाळावे असे सांगून, आपल्या व आपल्या कुटूंबियांच्या सुरक्षेसाठी वाहतूकीचे नियम कटाक्षाने पाळावेत.
याप्रसंगी कारखान्याकडील ऊस वाहतूकीच्या ट्रॅक्टर-ट्रेलर व बैलगाडयांना मान्यवरांच्या हस्ते रिप्लेक्टर लावण्यात आले. आणि बैलगाडी चालकांना मान्यवरांच्या हस्ते कारखान्याच्यावतीने रिप्लेक्टर जॅकेटचे वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्य शेती अधिकारी मोहनराव पाटील यांनी केले, स्वागत व सुत्रसंचालन ऊस विकास अधिकारी वसंतराव चव्हाण यांनी केले तर आभार उप ऊसविकास अधिकारी संजय चव्हाण यांनी मानले.
यावेळी कारखान्याचे जनरल मॅनेजर पी.आर.यादव, सिव्हील इंजिनिअर उदय पाटील, पर्यावरण इंजिनिअर हेमंत माने, ऊस पुरवठा अधिकारी एन.एस.साळुखे, केनयार्ड सुपरवायझर बळवंत नलवडे, तानाजी सुर्वे, शेख, पोलिस कॉन्स्टेबल अमर नारनवर, पोलिस नाईक शशिकांत खाडे, होमगार्ड दिपक गाडवे, अजिंक्य पाटील यांचेसह ऊस वाहतूक कंत्राटदार, वाहन चालक, बैलगाडीवान मोठ्या संख्येने उपस्थित होते.