मठाधिपती होण्याच्या वादातून महाराजांची निर्घृण हत्या पंढरपूर मधील खळबळजनक घटन


 


कराड -  मठाधिपती होण्याच्या वादातून कराडकर मठाचे मठाधिपती हभप जयवंतबुवा पिसाळ यांची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे याच मठाचे माजी मठाधिपती हभप बाजीराव कराडकर यांनी ही हत्या केल्याची माहिती प्रथमदर्शनी पुढे आली असून पोलिसांनी कराडकरला अटक केली आहे. अध्यात्मिक क्षेत्रात गुन्हेगारी प्रवेश करते की काय ? अशी भीती निर्माण होऊ लागली आहे. मारुतीबुवा कराडकर यांच्या निधनानंतर मठाधिपती कोण ? यावरून गेले अनेक वर्षे वाद सुरू आहे. या घटनेमुळे वारकरी संप्रदायामध्ये चिंता व्यक्त केली जात आहे.


याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, अनिलनगर परिसरातील कराडकर महाराजांच्या मठात सांगली जिल्ह्यातील वाळवा येथील रहिवासी जयवंत बुवा पिसाळ आणि बाजीराव बुवा कराडकर यांच्यामध्ये मठाधिपती होण्यावरुन वाद होता. हे दोघे काल एकादशीच्या निमित्ताने पंढरपूरमध्ये आले होते. आज दुपारी पुन्हा "मठाधिपती तू का मी" यावरून वाद सुरु झाला. त्यातून बाजीराव महाराजांनी जयवंत महाराजांच्या अंगावर चाकूने हल्ला करुन त्यांची निर्घृण हत्या केली.


मारुतीबुवा कराडकर मठामध्ये गेल्या काही वर्षापासून मठाधिपतीवरून वाद सुरू आहे. त्याच वादातून माजी मठाधिपती बाजीराव बुवा गुरू मारुतीबुवा कराडकर (वय ३४,कोडोली, ता. कराड ) यांनी विद्यमान मठाधिपती जयवंत महाराज पिसाळ (वय ३३, लवंगमाची,ता.वाळवा, जि.सांगली) यांची चाकूने वार करून हत्या केली.मठामध्येच दोन्ही महाराजांमध्ये वाद झाला आणि त्या दरम्यान बाजीराव बुवांनी चाकूने हल्ला करून जयवंतबुवा यांची हत्या केली. घटनेची माहिती मिळताच पोलिस मठामध्ये दाखल झाले आणि आरोपी बाजीराव बुवास घटनास्थळी अटक केली. या घटनेमुळे संपूर्ण वारकरी संप्रदायात खळबळ उडाली आहे.


मठाचा मठाधिपती कोण ? यातून असलेला वाद इतका विकोपाला गेला की, वारकरी संप्रदायाची  शिकवण हे दोघे विसरुन गेले.पोलिसांनी बाजीराव कराडकरला अटक केली आहे.या घटनेमुळे वारकरी संप्रदायात चिंतेचे वातावरण पसरले आहे.