पुणे –पिंपरी चिंचवड शहरात 6291.30 मेट्रिक टन अन्न धान्याचे वाटप -जिल्हाधिकारी नवल किशोर राम

 


पुणे –पिंपरी चिंचवड शहरात 6291.30 मेट्रिक टन अन्न धान्याचे वाटप -जिल्हाधिकारी नवल किशोर राम


पुणे - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरु असलेल्या लॉकडाऊन काळात जिल्ह्यातील कुठलाही नागरिक उपाशी रहाता कामा नये यासाठी अन्न नागरी पुरवठा विभागाकडून विविध उपाययोजना केल्या आहे. पुणे पिंपरी-चिंचवड शहरातील स्वस्त धान्य दुकांनामधून धान्याचे वितरण सुरळीत सुरु असून दि. 1 ते 5 एप्रिल 2020 या पाच दिवसात पुणे पिंपरी-चिंचवड शहरात  1 लाख 93 हजार 624 शिधापत्रिका धारकांना तब्बल 42 हजार 138 क्विंटल अन्नधान्याचे वाटप करण्याचा उच्चांक गाठला असल्याची माहिती जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिली आहे. तसेच टंचाई भासवून चढ्या दराने विक्री करणाऱ्या दुकानदारांवर  कारवाई करण्यात येत आहे.


            जिल्ह्यात राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत अंत्योदय शिधापत्रिका संख्या 8 हजार 625 व प्राधान्य कुटुंब लाभार्थी संख्या 12 लाख 26 हजार 175 आहे. या लाभार्थ्यांना 760 स्वस्त धान्य दुकानांद्वारे सार्वजनिक वितरण व्यवस्थेचा लाभ दिला जातो.  बीपीएल कार्ड असलेल्या लाभार्थ्यांना अंत्योदय योजनेतंर्गत 2 रुपये किलो दराने प्रति कार्ड 15 किलो गहू आणि            3 रुपये किलो दराने प्रति कार्ड 20 किलो तांदूळ दिला जातो.  त्याचप्रमाणे 20 रुपये किलो दराने एक किलो साखर दिली जाते तर केशरी रेशनकार्ड असलेल्या प्राधान्य कुटूंब लाभार्थ्यांना 2 रुपये किलो प्रति व्यक्ती 3 किलो गहू आणि 3 रुपये किलो  दराने प्रति व्यक्ती 2 किलो तांदूळ दिला जातो.


            पुणे पिंपरी-चिंचवड शहरात या योजनेमधून सुमारे 37 हजार 433 क्विंटल गहू, 2 हजार 448 क्विंटल तांदूळ वाटप करण्यात आले आहे. त्याच बरोबर स्थलांतरीत झालेले परंतू लॉकडाऊनमुळे जिल्ह्यात अडकलेल्या सुमारे 27 हजार 463 (Portability) शिधापत्रिका धारकांनी ते जेथे राहत आहे त्या ठिकाणी शासनाच्या पोर्टबिलीटी  यंत्रणेतंर्गत ऑनलाईन पध्दतीने अन्नधान्य घेतले आहे.


            प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेतर्गंत एप्रिल ते जून पर्यत प्रति लाभार्थी प्रति महिने 5 किलो तांदूळ मोफत देण्याची योजना आहे. पात्र रेशनकार्ड धारकाने नियमित स्वस्त धान्य खरेदी केल्यानंतर त्या कुटूंबातील प्रत्येक व्यकतीला 5 किलो अतिरिक्त तांदूळ मोफत देण्याची सूचना केंद्र शासनाने व्हिडीओ कॉन्फरन्स द्वारे दिलेली आहे. त्यामुळे आता प्रत्येक पात्र रेशनकार्ड धारकाला नियमित धान्य घेतल्यानंतर प्रति व्यक्ती 5 किलो तांदूळ दि. 10 एप्रिल पासून कुटूंबातील व्यक्तींच्या संख्येनुसार मोफत उपलब्ध होणार आहे. सदर योजनेकरीता तांदळाचे नियतन भारतीय खाद्य निगम पुणेकडून प्राप्त करुन घेतले जात दि. 10 एप्रिल 2020 पासून पात्र लाभार्थ्यांना मोफत तांदळाचे वितरण सुरु करण्यात येणार आहे. हे मोफत धान्य एप्रिल सोबतच मे आणि जून मध्ये सुध्दा त्या-त्या महिन्यात उपलब्ध करुन दिले जाणार आहे.


जास्त दराने वस्तूंची विक्री केल्यास होणार कारवाई


जिल्ह्यात जीवनावश्यक वस्तूंची आणि औषधांची कोणतीही टंचाई नाही. किराणा दुकांनामधून वस्तूंचा पुरवठा सुरळीत व्हावा याकरीता शासन यंत्रणा खबरदारी घेत आहे. मात्र सध्या लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर काळाबाजार व अतिरिक्त भाव वाढीच्या अनेक ठिकाणाहून तक्रारी प्राप्त होत आहेत. जीवनावश्यक वस्तूंची साठेबाजी किंवा  चढ्या दराने  विक्री केल्यास सात वर्षापर्यंत कैद होवू शकते. याबाबत पुरवठा विभाग, वैध मापन शास्त्र विभाग व पोलीस यांना संयुक्त कारवाई करण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती अन्न्‍धान्य वितरण अधिकारी अस्मिता मोरे यांनी दिली आहे.