महाबळेश्वर येथे स्ट्रॉबेरीवरील संशोधन केंद्र उभारणार.....मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला पर्यटन विकासाचा आढावा.....पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी केले स्वागत


महाबळेश्वर येथे स्ट्रॉबेरीवरील संशोधन केंद्र उभारणार.....मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला पर्यटन विकासाचा आढावा.....पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी केले स्वागत


कराड - महाबळेश्वर हे स्ट्रॉबेरी आणि जंगलातील फळे, मध यासाठी प्रसिद्ध आहे. मात्र या फळांवर याठिकाणी अधिक संशोधन करण्याची गरज आहे. राज्यात आणि देशातही महाबळेश्वरच्या स्ट्रॉबेरीची लागवड झाली पाहिजे, यासाठी एक संशोधन केंद्र सुरु करण्याचा प्रस्ताव देण्याच्या सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज कृषी विभागाला दिल्या. 


राजभवन येथील बैठक कक्षात महाबळेश्वर पर्यटन विकास बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बोलत होते. उद्योग मंत्री सुभाष देसाई, पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, जिल्हाधिकारी शेखर सिंग, कोल्हापूर वन परिक्षेत्राचे मुख्य वन संरक्षक डॉ बेन क्लेमंट, पोलीस अधीक्षक तेजश्री सातपुते, एमटीडीसीचे व्यवस्थापकीय संचालक अभिमन्यू काळे, यांची उपस्थिती होती. दरम्यान महाबळेश्वर (ता.महाबळेश्वर) जि. सातारा येथील  राजभवनामध्ये  मुख्यमंत्री  उद्धवजी ठाकरे यांचे सातारा जिल्ह्यात स्वागत  सहकार व पणनमंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी केले.


याप्रसंगी बोलताना मंत्री आदित्य ठाकरे म्हणाले उत्तम दर्जाचे स्ट्रॉबेरी क्रीम उत्पादित करून त्याला बाजारपेठ मिळण्याच्या दृष्टीनेही प्रयतन व्हायला हवेत. महाबळेश्वर येथे भारतातूनच नव्हे तर इतर देशातूनही पर्यटक येतात. याठिकाणी बहुभाषिक पोलीस आणि मार्गदर्शक असल्यास विविध भाषिक पर्यटकांना त्याचा फायदा होईल.


उत्तम संशोधन झाल्यास स्ट्रॉबेरीचा दर्जा व उत्पादन वाढेल तसेच राज्यातील इतर अनुकूल भागांतही स्ट्रॉबेरी पिक घेता येऊ शकेल यावर भर दिला पाहिजे असेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.


महाबळेश्वर एक लोकप्रिय ठिकाण असल्याने याठिकाणी पर्यटकांची मोठी संख्या असते. साहजिकच वाहनांची समस्या आहे. यासाठी महाबळेश्वरच्या बाहेरील भागात मोठे वाहनतळ करून बॅटरी किंवा इलेक्ट्रिक संचलित वाहनांचा उपयोग करता येईल का हे पाहण्याच्या सूचनाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या. महाबळेश्वरप्रमाणे परिसरातील पर्यटन स्थळांचा देखील विकास होये, ती लोकप्रिय होणे गरजेचे आहे त्यादृष्टीने प्रयत्न करण्याच्या सुचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पर्यटन विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या. येथील पर्यटन स्थळे विकसित करण्यासाठी कालबध्द रीतीने मंत्रालयातून मान्यता देण्यात येतील असेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.