ग्रामपंचायत जैवविविधता नोंदवहीत सातारा जिल्हा अग्रक्रमावर


ग्रामपंचायत जैवविविधता नोंदवहीत सातारा जिल्हा अग्रक्रमावर


कराड - राज्यात सातारा जिल्ह्याचे काम जैवविविधता नोंदवहीमध्ये आदर्शवत झाले आहे. जैवविविधता नोंदवहीमध्ये सातारा जिल्ह्याचे चांगले काम झाले असून राज्य शासनाने ग्रामपंचायत विभागाचे कौतुक केले आहे. राज्यात सर्वात जास्त जैवविविधता नोंदवह्या सातारा जिल्ह्याच्या जमा झाल्या आहेत अशी माहिती उप मुख्यकार्यकारी अधिकारी अविनाश फडतरे यांनी दिली.


सातारा जिल्ह्यातील 1 हजार 495 ग्रामपंचायतीपैकी 1 हजार 348 ग्रामपंचायतीनी जैवविविधता नोंदवही जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाकडे सादर केल्या आहेत. दरम्यान 147 गावांची जैवविविधता नोंदवही कोरीच असल्यामुळे ग्रामपंचायतीना प्रशासनामार्फत नोटिसा देण्यात आले आहेत. राज्य शासनाने गावोगावच्या जैवविविधता संरक्षणासाठी स्वतंत्र जैवविविधता महामंडळाची स्थापना करण्यात आली आहे. जैवविविधता कायदा 2002 नुसार सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांनी आपल्या परिसरातील जैवविविधतेच्या संरक्षण संवर्धनासाठी स्थानिक जैवविविधता व्यवस्थापन समिती आणि नोंदवही तयार करणे बंधनकारक आहे. 


राष्ट्रीय हरित लवादाने ऑगस्ट 2019 मध्ये कठोर भुमिका घेत सर्व स्थानिक जैवविविधता समिती स्थापना आणि नोंदवह्या पूर्ण करण्याचे आदेश दिले. जैवविविधता नोंदवही करण्याची कामे 39 स्वयंसेवी संस्थांना देण्यात आली आहेत. जिल्ह्यातील तालुकानिहाय आकडेवारी अशी, सातारा 194 ग्रामपंचायतीनी नोंदवह्या दिल्या तर कोरेगाव 142 पैकी 140, खटाव 133 पैकी 132, माण 95 पैकी 94, फलटण 128 पैकी 78, खंडाळा 63 पैकी 49, जावली 125 पैकी 124, महाबळेश्‍वर 79 पैकी 19, कराड 198 पैकी 188, पाटण 238 पैकी 231 ग्रामपंचायतीच्या नोंदवह्या मिळाल्या आहेत.


सातारा व वाई तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींनी जैवविविधता नोंदवह्या पूर्ण करून दिल्या आहेत. ज्या ग्रामपंचायतीच्या नोंदवह्या जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाकडे प्राप्त झाल्या नाहीत अशा 147 ग्रा.पं.ना प्रशासनामार्फत नोटिसा बजावल्या आहेत.1 हजार 348 ग्रामपंचायतीच्या नोंदवह्या राज्याच्या पुणे येथील जैवविविधता मंडळाकडे पोहोच करण्यात आल्या आहेत. 


प्रशासकीय अधिकाऱ्यांची सकारात्मकता


शासनाला अभिप्रेत असे जैवविविधता नोंदवहीचे काम जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, उपवनसंरक्षक यांनी केले. प्रशासकीय पातळीवर सातारा जिल्हा नेहमीच विविध विभागात अग्रक्रमावर राहिला आहे. यासाठी प्रशासकीय अधिकारी नेहमी सकारात्मक परिश्रम घेत असतात.