गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई शिवसेना पक्षवाढीसाठी आघाडीवर... शासनाच्या माध्यमातून पक्षसंघटनेला बळकटी देण्याचा प्रयत्न......मंत्रीपदाच्या ५० दिवसात दाखवून दिला उल्लेखनीय कार्याचा करिष्मा


गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई शिवसेना पक्षवाढीसाठी आघाडीवर... शासनाच्या माध्यमातून पक्षसंघटनेला बळकटी देण्याचा प्रयत्न......मंत्रीपदाच्या ५० दिवसात दाखवून दिला उल्लेखनीय कार्याचा करिष्मा


३० डिसेंबर,२०१९ रोजी महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री म्हणून शपथ घेतलेले पाटण विधानसभा मतदारसंघाचे आमदार आणि आताचे राज्याचे गृह (ग्रामीण),वित्त,नियोजन,राज्य उत्पादन शुल्क,कौशल्य विकास व उद्योजकता, पणन राज्यमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी त्यांना महाविकास आघाडीमध्ये मिळालेल्या राज्यमंत्रीपदाच्या तसेच वाशिम जिल्हयाच्या पालकमंत्री पदाच्या माध्यमातून पक्षवाढीसाठी पश्चिम महाराष्ट्रातील महाविकास आघाडीमध्ये आघाडी घेतली असून शासनाच्या आणि मिळालेल्या मंत्रीपदाच्या मोठमोठया खात्यांच्या माध्यमातून त्यांनी पक्षसंघटनेला बळकटी देण्याचा उल्लेखनीय प्रयत्न सुरु केला आहे.मंत्रीपदाची शपथ घेवून आज त्यांना ५० दिवस पुर्ण होत असून एक मंत्री म्हणून कसे उल्लेखनीय आणि जनहितार्थ काम करता येते हे त्यांनी गेल्या ५० दिवसात महाराष्ट्रातील विशेषत: पश्चिम महाराष्ट्रातील जनतेला दाखवून दिले आहे.


२००४ ला पहिल्याच आमदारकीच्या टर्ममध्ये महाराष्ट्र विधानमंडळाचे उत्कृष्ट संसदपटू म्हणून देशाच्या तत्कालीन राष्ट्रपती यांच्या शुभहस्ते गौरविलेले ना.शंभूराज देसाई यांचा प्रशासकीय तसेच विधानसभेतील कामांचा आमदार तसेच चारवेळा विधानसभा तालिका अध्यक्ष म्हणून दांडगा अभ्यास असून एक शिस्तप्रिय आणि जनतेच्या जनहितार्थ कामांसाठी धडपडणारा लोकप्रतिनिधी म्हणून त्यांची सातारा जिल्हयासह संपुर्ण महाराष्ट्रात ओळख आहे.तीनवेळा पाटण या डोंगरी आणि दुर्गम भागाचे आमदार म्हणून निवडून आलेले शंभूराज देसाई यांच्या आमदारकीच्या मागील दोन टर्ममधील कामांची तसेच जनहितार्थ कार्याची आणि ग्रामीण भागात पक्षसंघटना मजबूत करण्याकरीता केलेल्या प्रयत्नांची पध्दत पाहून राज्यातील महाविकास आघाडीचे प्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री ना.उध्दवजी ठाकरे यांनी शंभूराज देसाईंना राज्याच्या राज्यमंत्री पदाची जबाबदारी सोपविली आहे.


आपल्याला मिळालेल्या गृह (ग्रामीण),वित्त,नियोजन,राज्य उत्पादन शुल्क,कौशल्य विकास व उद्योजकता, पणन या पाच खात्याचा पदभार स्विकारल्यानंतर त्यांनी गत ५० दिवसात त्यांच्या अंगी असणाऱ्या कार्याचा करीष्माच दाखविण्यास सुरुवात केली आहे.महिन्याभरातच त्यांनी राज्यमंत्री पदाच्या माध्यमातून त्यांचेकडील खात्यांच्या आढावा बैठका घेण्या बरोबरीने वित्त व नियोजन विभागांच्या राज्यस्तरीय बैठकांना उपस्थित राहून राज्याचे वित्तमंत्री ना.अजितदादा पवार यांचेकडे आग्रही राहून सातारा जिल्हयाबरोबर पालकत्व असलेल्या वाशिम जिल्हयाच्या विकासासाठी तसेच सातारा जिल्हयाच्या शेजारील सांगली,कोल्हापुर जिल्हयाच्या विकासासाठी जादाचा निधी कसा आणता येईल यासाठी प्रयत्नशील राहून वित्त व नियोजन विभागांच्या माध्यमातून या चारही जिल्हयांना जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून जादाचा निधी खेचून आणणेकरीता ते यशस्वी झाले आहेत.मागील पाच ते दहा वर्षात या चारही जिल्हयाना जिल्हा नियोजनच्या माध्यमातून निधी आला नाही त्याहीपेक्षा जादाचा निधी त्यांनी वित्तमंत्री ना. पवार यांचेकडून वित्त व नियोजन राज्यमंत्री म्हणून मिळवून दिला आहे. जिल्हा नियोजनच्या निधीच्या माध्यमातून ग्रामीण भागाच्या विकासाकरीता या वाढीवच्या निधीचा हातभार लागणार असून ग्रामीण भागाचा पायाभूत विकास होण्यास या निधीची मदत होणार आहे.


एका बाजूला मिळालेल्या खात्यांच्या आढावा बैठका घेण्याबरोबर त्यांनी महाविकास आघाडीच्या माध्यमातून सातारा असो वा वाशिम तसेच सांगली आणि कोल्हापुर येथील शिवसेना पक्षाचे आजी माजी आमदार, पक्षाचे जिल्हाप्रमुख, उपजिल्हा प्रमुख, जिल्हा महिला संघटक, युवा सेना जिल्हाप्रमुख,उपजिल्हाप्रमुख, तालुकाप्रमुख तसेच पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्या आढावा बैठका घेण्यावर जोर लावला आहे.प्रमुख पदाधिकारी यांच्या समस्या जाणून घेवून त्यावर शासनाकडे पाठपुरावा करुन त्या सोडविण्याचा तसेच काही प्रश्न जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांकडे प्रलंबीत असतील तर त्या संबधित अधिकाऱ्यांना बोलावून घेवून त्या जागेवरच सोडविण्याचा प्रयत्न करुन तसेच त्या त्या विषयासंदर्भात अधिकाऱ्यांच्या बैठका घेवून पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्ते यांना राजकीय ताकद मिळवून देण्याचा त्यांचा प्रयत्न कौतुकास्पद मानला जात आहे.


गत ५० दिवसात त्यांनी सातारा जिल्हयातील शिवसेना पक्षाच्या पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या दोनदा तर वाशिम,सांगली व कोल्हापुर येथील पक्षाच्या पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या एक एक आढावा बैठका घेतल्या आहेत.दोनच दिवसापुर्वी कोल्हापुर जिल्हयाच्या पक्षाच्या आढावा बैठकीमध्ये उपस्थित असणारे आजी माजी आमदार यांनी त्यांच्या मनोगतामध्ये ना.शंभूराज देसाईंच्या राज्यमंत्री म्हणून कार्याचा उल्लेखनीय गौरव करीत शिवसेना पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या बैठका घेवून त्यांच्या समस्या जाणून घेवून त्यावर तोडगा काढत पदाधिकारी कार्यकर्त्यांना ताकद देण्याचा ना.शंभूराज देसाईंच्या या उपक्रमामुळे शिवसेना पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या मनगटावर इंचभर मांस वाढले असल्याची मनोगते व्यक्त केली आहेत. हे सगळे होत असताना पाटण मतदारसंघातील विविध जनहितार्थ कामांवरील लक्ष त्यांनी अजिबात विचलीत केले नसून मतदारसंघावरील त्यांची पकड त्यांनी कणभरही कमी होवू दिली नाही.मंत्रालयीन कामकाज उरकुन मतदारसंघाच्या दौऱ्यावर आलेनंतर मतदारसंघातील विविध भागात स्वत: जावून ते मतदारसंघातील जनतेच्या समस्या, अडीअडचणी जाणून घेत त्यावर तोडगा काढत आहेत.मंत्रीपदाची शपथ घेवून आज त्यांना ५० दिवस पुर्ण होत असताना ना.शंभूराज देसाईंनी त्यांच्या कार्याचा उल्लेखनीय करीष्मा दाखविण्याबरोबर महाविकास आघाडीच्या शासनाच्या माध्यमातून पश्चिम महाराष्ट्रामध्ये पक्षसंघटना मजबुत व पक्षाला बळकटी आणण्याकरीता ना.शंभूराज देसाईंनी आघाडी घेतली असल्याचे त्यांच्या कामांतून दिसून येत आहे.