साखर कारखान्यांनी शेतकर्‍यांचे 228 कोटी 53 लाख 88 हजार थकवले 


साखर कारखान्यांनी शेतकर्‍यांचे 228 कोटी 53 लाख 88 हजार थकवले 


कराड - सातारा जिल्ह्यातील 14 कारखान्यांकडून शेतकरी सभासदांचा ऊस गाळप सुरू आहे. ऊस गाळप केलेल्या कारखान्यांनी एकूण एफआरपी 1 हजार कोटी 14 लाख 7 हजार रूपये होत आहे. तीन महिने झाल्यानंतरही कारखान्यांनी शेतकर्‍यांचे अद्याप 228 कोटी 53 लाख 88 हजार रूपये थकवले आहेत. दरम्यान, 14 दिवसांत बिल न दिल्यास पुढील रकमेवर 15 टक्के व्याजाने रक्‍क द्यावी, असे कायद्यात तरतूद आहे. त्याप्रमाणे साखर कारखाने व्याज देणार का ? असा सवाल शेतकरी संघटनांनी उपस्थित केला असून साखर आयुक्तांना निवेदन दिले आहे. त्याचबरोबर एफआरपी व व्याज मिळावे यासाठी आंदोलन करण्याचा इशारा शेतकरी संघटना वारंवार देत आहेत.


महापूर, अतिवृष्टी व परतीच्या पावसामुळे यंदा गाळप हंगाम डिसेंबर महिन्यात सुरू झाला. याचा मोठा फटका शेतकर्‍यांना बसला. शेतकऱ्यांचे अनेक प्रकारचे नुकसान झाले. नैसर्गिक आपत्तीमध्ये सापडलेल्या शेतकऱ्याला उसाचे बिल वेळेत कारखान्याकडून मिळणे गरजेचे आहे. दरम्यान सहकारी साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांच्या अडचणींचा विचार न करता त्यांना एफआरपी नुसार रक्कम दिलेली नाही.एका बाजूला नैसर्गिक आपत्तीने तर दुसऱ्या बाजूला कारखान्यांनी शेतकऱ्यांवर अन्यायच केला आहे. अशी शेतकऱ्यांची भावना निर्माण झाली आहे.


यंदा शेतकरी अडचणीत सापडलेला आहे तर ऊसाला उतारा चांगला आहे. सातारा जिल्ह्यातील सह्याद्री व अजिंक्यतारा हे दोन कारखाने वगळता सर्वच कारखान्यांनी 2500 रूपयांप्रमाणे बिल काढले आहे. दरम्यान, पूर्ण एफआरपीचे काही कारखान्यांनी तुकडे केले आहेत. या कारखान्यांबाबत शेतकरी संघटनेकडून वारंवार तक्रार केल्यानंतरही कोणतीच कार्यवाही केली जात नाही.दरम्यान जिल्हाधिकाऱ्यांनी पुढाकार घेऊन कारखान्याचे चेअरमन, संचालक, शेतकरी संघटनेचे पदाधिकारी यांच्याबरोबर बैठक घेणे आवश्यक आहे.


महापूर व अतिवृष्टीमुळे कराड व पाटणसह इतर तालुक्यांमध्येही ऊस उत्पादक शेतकर्‍यांचे नुकसान झाले होते. त्यामुळे दिवसेंदिवस उसाच्या वजनात घट होत होती. त्यातच हंगाम उशीरा सुरू झाल्याने शेतकरी आणखी अडचणीत आला आहे. तोड सुरू झाल्यापासून लवकरात लवकर आपला ऊस कारखान्यावर गेला पाहिजे, असा प्रयत्न होत आहे. मात्र, या सर्व घाईगडबडीत शेतक-यांचे नुकसान होत आहे. दर उस तोडणी वजा 2700 च्या आसपास दर जाहीर केला. मात्र, बिल देताना 2500 रूपयांचे काढले आहे. 


ऊस गाळपाला वेग मात्र रक्कम जमा नाही


सातारा जिल्ह्यातील 14 सहकारी साखर कारखान्यांचा हंगाम सुरू आहे.कारखान्याचा गाळप हंगाम अजून दोन महिने सुरू राहण्याची शक्यता आहे.यामुळे कारखान्याकडे नोंद असलेला ऊस गाळप करण्याचे नियोजन सहकारी साखर कारखान्यांनी केलेले आहे. हंगाम सुरू होवून तीन महिने झाल्यानंतरही पूर्ण पैसे शेतकर्‍यांच्या खात्यावर पडलेले नाहीत.