घरी परतताना काळाने घातला घाला

घरी परतताना काळाने घातला घाला


कराड - जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या धास्तीनेच, कोल्हापूरच्या तिघांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. मुंबईहुन मुळ गावी शाहूवाडीकडे येताना, दुचाकी घसरून कराड येथे झालेल्या अपघातात आई-वडिलांसह चिमुकल्यांचा मृत्यू झाला आहे.


मूळचे जांबुर (ता.शाहूवाडी) येथील सर्जेराव भीमराव पाटील (३३) हे कामानिमित्त मुंबई डोंबिवली येथे परिवारासह राहतात.कोरोनाच्या धास्तीने ते पत्नी पुनम (२७) आणि मुलगा अभय (७) यांना दुचाकीवरून मंगळवार (दि.२४) रोजी गावी येत होते. पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर कराडजवळ त्यांची दुचाकी घसरून झालेल्या अपघातात तिघेही गंभीर जखमी झाले.स्थानिक नागरिकांनी त्यांना तातडीने कराड येथील कृष्णा रुग्णालयात दाखल केले.मात्र उपचार सुरू असताना तिघांचाही मृत्यू झाला.


कोरोनाच्या धास्तीने तसेच रोजगारही नसल्याने,अनेक जण मिळेल त्या वाहनाने तसेच मैलोनमैल पायपीट करीत मुळगावी जात आहेत.पाटील कुटुंबीयही आपल्या गावी येत असताना,काळाने त्यांच्यावर घाला घातला.या अपघाताचा धक्का कुटुंबीयांना बसला असून,परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.