सह्याद्री, कृष्णा, रयत साखर कारखान्यांचा उतारा १२ टक्केंचे पुढे


सह्याद्री, कृष्णा, रयत साखर कारखान्यांचा उतारा १२ टक्केंचे पुढे


कराड - कराड तालुक्यातील सह्याद्री, कृष्णा, रयत सहकारी आणि जयवंत शुगर कारखान्यांचा हंगाम सुरू असून साखर कारखान्यांचा उतारा १२ टक्क्यांच्या पुढे गेला आहे.विशेष म्हणजे कारखान्याकडे नोंद असलेला संपूर्ण ऊस गाळप होत नाही तोपर्यंत सह्याद्री सहकारी साखर कारखाना गाळप बंद करीत नाही.


कराड तालुक्यातील गेल्या तीन ते साडे तीन महिन्यांच्या कालावधीत साखर कारखान्यांनी चांगली कामगिरी केली आहे. उतार्‍यामध्ये कराड तालुका आघाडीवर आहे. गतकाळात झालेल्या महापूर व अतिवृष्टीमुळे उसाचे नुकसान झाल्याने ऊसगाळपासाठी उस अत्यंत कमी मिळाल्याने काही कारखाने लवकरच बंद होतील. दरम्यान सातारा जिल्ह्याचा विचार करता जिल्ह्यातील 9 सहकारी व 5 खासगी कारखान्यांनी 57 लाख 5 हजार 245 मेट्रीक टन उसाचे गाळप केले आहे. यातून 67 लाख 8 हजार 205 क्‍विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. 


कराड तालुक्यातील साखर कारखान्यांनी उतार्‍यात आघाडी घेतली असल्याचे चित्र आहे. कृष्णा, सह्याद्री, रयत (कराड) लो. बा. देसाई (पाटण), अजिंक्यतारा (सातारा) जरंडेश्‍वर (कोरेगाव) या सहा सहकारी साखर कारखान्यांचा उतारा 12 टक्क्यांच्यापुढे गेला आहे. यंदाच्या हंगामात सहकारी कारखान्यांपेक्षा खासगी कारखान्यांनी चांगली कामगिरी केली आहे. सहकारी कारखान्याचे गाळप, उत्पादन व उतारा जास्त आहे. सहकारी व खासगी कारखान्यांची कामगिरी चांगली उल्लेखनीय आहे. सातारा जिल्ह्यात 14 कारखाने अजूनही पूर्ण क्षमतेने सुरू आहेत. आणखी काही दिवसांमध्ये मोठया प्रमाणात गाळप करून रिकव्हरी वाढण्याची शक्यता आहे. 


एफआरपी व व्याज द्यावे 


आणखी काही दिवस हंगाम सुरू राहणार असल्याने रिकव्हरी वाढणार आहे. हंगााम संपत आला तरी काही कारखान्यांनी एफआरपी पूर्ण केलेली नाही. यामुळे शेतकरी संघटना आक्रमक झाल्या आहेत.एफआरपी व त्यावरील व्याज द्यावे असा आग्रह धरला आहे.