गरजूंसाठी नगरसेवक सरसावले.....जीवनावश्यक वस्तूंचे केले वाटप


गरजूंसाठी नगरसेवक सरसावले.....जीवनावश्यक वस्तूंचे केले वाटप


सातारा- लॉक डाऊनमुळे हातावर पोट असणाऱ्यांची मोठी गैरसोय होत आहे. गोर गरीब आणि गरजू लोकांपर्यंत जीवनावश्यक वस्तू पुरवून माजी उपनगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक अविनाश कदम यांनी सामाजिक बांधिलकीचा अनोखा आदर्श घालून दिला आहे. प्रभाग क्र. १८ मध्ये कदम यांनी १०० गरजू आणि गोर गरीब लोकांना अन्नधान्य पुरवून लॉक डाऊन काळात या लोकांना मोठा दिलासा दिला आहे. 


कोरोनाच्या महाभयंकर संकटामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. जीवनावश्यक वस्तूची दुकाने वगळता देशभरात इतर सर्व दुकाने बंद आहेत. लॉक डाऊनमुळे इतर सर्व दुकाने बंद असल्याने हातावर पोट असणाऱ्या आणि गोर- गरीब लोकांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. अशा लोकांना विविध स्तरातून मदतीचा हात दिला जात असतानाच सातारा शहरातील प्रभाग क्र. १८ मधील अशाच शेकडो गोर गरीब आणि गरजू लोकांसाठी नगरसेवक कदम धावून आले. अविनाश कदम यांनी प्रभागातील गरजू लोकांना जीवनावश्यक वस्तू स्वखर्चातून भेट देऊन या लोकांच्या पोटाला खऱ्या अर्थाने आधार देण्याचे काम केले आहे. 


प्रत्येक व्यक्तीला पाच किलो गहू, पाच किलो तांदूळ, तूरडाळ, मूग, तेल (प्रत्येकी १ किलो), कांदा, लसूण चटणी अशी शंभर किट बनवून वॉर्डातील गरजू नागरिकांपर्यंत पोहचवण्यात आली. नगरसेवक कदम आणि नगर पालिकेचे मुख्याधिकारी शंकर गोरे  यांच्या हस्ते या किटचे वाटप करण्यात आले तर भूषण गोसावी, संजय पवार, संजय ढवळे, विनीत कुलकर्णी, सुबोध साने, सुनील प्रभुणे, अन्वय कुलकर्णी आदी कार्यकर्त्यांनी हि पॅकेट्स गरजूंच्या घरी पोहचवली. यावेळी कोरोनापासून संरक्षण व्हावे यासाठी सर्वांनी मास्क परिधान केले होते तसेच सोशल डिस्टंसिंगचेही काटेकोरपणे पालन करण्यात आले. दरम्यान नगरसेवक कदम यांच्या या उपक्रमाचे प्रभागातील नागरिकांनी कौतुक केले.