आपल्या घासातला घास काढून अडचणीत सापडलेल्यांना मदत करावी : खासदार श्रीनिवास पाटील सामाजिक संघटना, दानशूर व्यक्तीने मदतीसाठी पुढे यावे : मोनिका सिंह ठाकुर


आपल्या घासातला घास काढून अडचणीत सापडलेल्यांना मदत करावी : खासदार श्रीनिवास पाटील
सामाजिक संघटना, दानशूर व्यक्तीने मदतीसाठी पुढे यावे : मोनिका सिंह ठाकुर


कराड - आपल्या घासातला घास काढून अडचणीत सापडलेल्यांना मदत करणं हीच आज काळाची गरज आहे.असे प्रतिपादन खासदार श्रीनिवास पाटील यांनी केले. बेलवडे तालुका कराड येथे सदरचा कार्यक्रम संपन्न झाला.


सातारा जिल्ह्यातील सातारा उपविभाग, वाई आणि कोरेगाव उपविभागातील लॉकडाऊनमूळे अडचणीत सापडलेल्या कुटुंबांसाठी मदत म्हणून श्रीनिवास पाटील फाऊंडेशन व पुनित बालन ग्रुप पुणे यांच्या वतीने १,००० धान्यांचे कीट वितरणासाठी सातारा उपजिल्हाधिकारी सौ. मोनिका सिंग ठाकूर यांच्याकडे सुपूर्द केले. यावेळी तहसीलदार अमरदीप वाकडे उपस्थित होते. या कीटमध्ये ५ किलो आटा, ५ किलो तांदूळ, १ लिटर खाद्यतेल, १ किलो तूरडाळ, २०० ग्रॅम चटणी यांचा समावेश आहे.


लोकांना रोजगार मिळाला पाहिजे. यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी लवकरात लवकर सातारा जिल्ह्यातील उद्योग सुरू करावेत. यासाठी आपण स्वतः जिल्हाधिकारी यांच्याशी बोलणार असल्याचे सांगून श्रीनिवास पाटील म्हणाले, कोरोना संसर्गामुळे अनेक लोकांची उपासमार होण्याची शक्यता असल्यामुळे ते उपाशी राहू नयेत. यासाठी प्रशासनाच्या मदतीने जीवनावश्यक वस्तूंचे कीट त्यांच्यापर्यंत पोहोचवले जात आहे. तहसीलदार अमरदीप वाकडे यांनी विनंती केल्यानुसार जास्तीत जास्त जीवनावश्यक वस्तूंचे किट उपलब्ध करून दिले जात आहे. संकट काळात सर्वांनी मदतीसाठी पुढे यावे असे आवाहनही खासदार श्रीनिवास पाटील यांनी केले.


सातारा लोकसभा मतदारसंघामध्ये शेकडो लोकांना उपजिवीकेचे साधनांची अडचण असल्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ येऊ नये. यासाठी आपण सर्वांनी प्रयत्नशील राहिले पाहिजे. आपल्या घासातला घास काढून अडचणीत सापडलेल्यांना मदत करणं हीच आज काळाची गरज आहे.असेही खासदार श्रीनिवास पाटील म्हणाले.


स्वयंसेवा संघटना मदतीसाठी पुढे येत आहेत. या संकटकाळात अधिकाधिक संघटनांनी पुढे येऊन प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन मोनिका सिंह ठाकूर यांनी केले आहे. खासदार श्रीनिवास पाटील यांनी अन्नधान्य लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रशासनाकडे दिले आहे. त्याचा योग्य विनियोग केला जाईल.सामाजिक संघटना जशी मदत करेल तसे तहसीलदारांना विचारून आवश्यक ती मदत त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न जिल्हा प्रशासन करीत आहे. सामाजिक संघटना व दानशूर व्यक्तीने मदतीसाठी पुढे यावे असे आवाहनही मोनिका सिंह ठाकुर यांनी केले आहे.