कर्तव्यात कसूर करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा सेवाग्राम-पवनार-वर्धा विकास आराखड्यातील कामे २ ऑक्टोबरपूर्वी पूर्ण करावीत : उपमुख्यमंत्री


कर्तव्यात कसूर करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा


सेवाग्राम-पवनार-वर्धा विकास आराखड्यातील कामे  ऑक्टोबरपूर्वी पूर्ण करावीत : उपमुख्यमंत्री


मुंबई - राष्ट्रपिता महात्मा गांधीजींच्या 150व्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर सेवाग्राम-पवनार-वर्धा विकासांतर्गत सुरु करण्यात आलेली कामे 2 ऑक्टोबरपूर्वी पूर्ण करावीत. ही कामे दर्जेदार होतील याकडे पालकमंत्री, जिल्हाधिकारी व संबंधित लोकप्रतिनिधींनी व्यक्तीश: लक्ष घालावे. महात्मा गांधी आणि आचार्य विनोबा भावे यांच्या व्यक्तिमत्वातली महानता या सर्व कामांमध्ये प्रतिबिंबित व्हावी. अशी अपेक्षा व्यक्त करतांनाच या कामांसाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, गरज लागेल तसा निधी उपलब्ध करुन दिला जाईल, असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिला.


सेवाग्राम-पवनार-वर्धा विकास आराखड्याच्या अंमलबजावणीसंदर्भात मंत्रालयात आयोजित बैठकीत मार्गदर्शन करताना उपमुख्यमंत्र्यांनी वर्धा, सेवाग्राम व पवनार परिसराचं राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय महत्वं लक्षात घेऊन विकासकामांना वेग द्यावा. कामांच्या दर्जाशी तडजोड करु नये. या कामाचे महत्व लक्षात घेऊन जबाबदारी पार पाडावी. कर्तव्यात कसून करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही उपमुख्यमंत्र्यांनी बैठकीत दिला. बैठकीला वर्ध्याचे पालकमंत्री सुनील केदार, आमदार पंकज भोयर आदींसह जिल्हा व मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.


यावेळी सेवाग्राम विकास आराखड्यांतर्गत तसेच ‘गांधी फॉर टुमॉरो’ या गांधी विचार संशोधन व संसाधन केंद्रासंदर्भात सादरीकरण करण्यात आले. वर्धा जिल्ह्यात सेवाग्राम आणि पवनार आश्रमांसह अनेक ऐतिहासिक संस्था, संघटना, व्यक्ती सामाजिक काम करत आहेत. त्यांच्या कामांची ओळख सर्वांना व्हावी, तसंच या निमित्ताने पर्यटनाची नवी संधी उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न आहे. वर्धा विकास आराखड्यांतर्गत गांधी विचारांच्या प्रचार-प्रसारासाठी, तसेच येणाऱ्या पर्यटकांसाठी विविध सोयी-सुविधा निर्माण करण्यात येत आहेत. या कामांसाठी शासन आवश्यक निधी उपलब्ध करुन देत असताना कामाचा दर्जा राखण्याची अपेक्षा असणार आहे, हे देखील उपमुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.


वर्धा शहरातील, जिल्ह्यातील शासकीय कार्यालये, निवासस्थाने, पर्यटनस्थळांच्या ठिकाणी  स्वच्छतेवर विशेष भऱ देण्याच्या सुचनाही त्यांनी दिल्या. वर्धा विकास आराखड्याच्या पाहणीसाठी आपण स्वत: नियमित भेट देणार असल्याचे त्यांनी बैठकीत स्पष्ट केले. जिल्हा विकास योजनेंतर्गत नागपूरला १०० कोटी आणि वर्ध्याला २५ कोटी रुपयांचा अतिरिक्त निधी देण्यात आल्याची माहितीही त्यांनी बैठकीत दिली.