कोल्हापूर, सांगली सातारा या जिल्ह्यातील संभाव्य पूरपरिस्थिती संदर्भाबाबत महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री श्री जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली कर्नाटक राज्याचे जलसंपदा मंत्री श्री रमेश जारकीहोळी व महाराष्ट्र राज्याचे सहकार पणन मंत्री श्री बाळासाहेब पाटील यांची बैठक


कोल्हापूर, सांगली सातारा या जिल्ह्यातील संभाव्य पूरपरिस्थिती संदर्भाबाबत महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री श्री जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली कर्नाटक राज्याचे जलसंपदा मंत्री श्री रमेश जारकीहोळी व महाराष्ट्र राज्याचे सहकार पणन मंत्री श्री बाळासाहेब पाटील यांची बैठक


मुंबई अतिथीगृहात पार पडली बैठक ;तिन्ही जिल्हयातील मंत्री, स्थानिक आमदार, खासदार उपस्थित 


मुंबई दि. ८ जुलै - कोल्हापूर, सांगली, सातारा भागातील संभाव्य पूरपरिस्थिती टाळण्यासाठी अलमट्टी धरणाविषयी आज राज्याचे जलसंपदामंत्री श्री जयंत पाटील व सहकारमंत्री श्री बाळासाहेब पाटील यांची कर्नाटकचे जलसंपदामंत्री रमेश जारकीहोळी यांच्यासोबत सह्याद्री अतिथीगृह मुंबई येथे बैठक पार पडली. 


दरम्यान मागीलवर्षी दोन्ही राज्यांना पूराचा मोठा तडका बसला होता.या अनुषंगाने यंदा ही पूरपरिस्थिती टाळण्यासाठी बैठक घेण्यात आली.


दोन्ही राज्यात समन्वय साधण्यासाठी शासन तीन समित्या स्थापन करण्याच्या विचारात आहे. या समित्या इंजिनियरस्तरीय, सचिवस्तरीय व मंत्रीस्तरीय असणार आहे. पूर येण्याआधी दोन्ही राज्याना अलर्ट कसा दिला जाऊ शकतो याबाबतीतही चर्चा झाली. 


गेल्या २०-२५ वर्षात कृष्णा खोऱ्यात अलमट्टी धरणापर्यंत विविध बांधकामे झाली आहेत. त्यामुळे पाणी वाहून जाण्यात अडथळा निर्माण होतो. या सर्व बांधकामांचे येत्या काळात ऑडिट केले जाईल. हे अडथळे दूर करण्यासाठीही दोन्ही राज्य प्रयत्नशील राहणार आहे असेही या बैठकीत ठरले.


महाराष्ट्रातून कर्नाटकाला सोडल्या जाणाऱ्या पाण्याचा काही भाग सांगली जिल्ह्यातील दुष्काळी असलेल्या जत तालुक्याला कसा दिला जाईल याबाबतही विचार दोन्ही शासन करणार असल्याचे ठरविण्यात आले.


पाणी सुरक्षिततेसाठी विविध प्रश्नांवर दोन्ही सरकारचे एकमत होण्यासाठी सकारात्मक चर्चा झाली. लवकरच या सगळ्या गोष्टी अंमलात आणण्यासाठी दोन्ही सरकार प्रयत्न करणार आहे. यावेळी कर्नाटक सरकारतर्फे अल्पसंख्याक मंत्री श्रीमंथ पाटील, स्लमबोर्ड अध्यक्ष मेहशकुमार कुमाट्टली, अतिरिक्त मुख्य सचिव राकेश सिंग तर महाराष्ट्राचे राज्यमंत्री श्री सतेज पाटील, श्री विश्वजित कदम, श्री राजेंद्र यड्रावकर पाटील, खासदार श्री धैर्यशील माने, श्री संजय पाटील आणि तिन्ही जिल्हा चे स्थानिक आमदार उपस्थित होते.