सातारा जिल्ह्यात साखर कारखान्याची कामगिरी चांगली....जिल्ह्याचा उतारा 11.75 टक्के


सातारा जिल्ह्यात साखर कारखान्याची कामगिरी चांगली....जिल्ह्याचा उतारा 11.75 टक्के


कराड - सातारा जिल्ह्यात एप्रिल मध्यापर्यंत हंगाम सुरू राहील अशी शक्यता निर्माण झाली आहे. गेल्या तीन ते साडे तीन महिन्यांच्या कालावधीत साखर कारखान्यांनी चांगली कामगिरी केली आहे. उतार्‍यामध्ये सातारा जिल्हा आघाडीवर आहे. सातारा जिल्ह्याचा उतारा 11.75 टक्के इतका आहे. विशेष म्हणजे कारखान्याकडे नोंद असलेला संपूर्ण ऊस गाळप होत नाही तोपर्यंत सह्याद्री सहकारी साखर कारखाना गाळप बंद करीत नाही.


गतकाळात झालेल्या महापूर व अतिवृष्टीमुळे उसाचे नुकसान झाल्याने ऊसगाळपासाठी उस अत्यंत कमी मिळाल्याने काही कारखाने लवकरच बंद होतील. दरम्यान सातारा जिल्ह्याचा विचार करता 3 मार्चपर्यंत जिल्ह्यातील 9 सहकारी व 5 खासगी कारखान्यांनी 57 लाख 5 हजार 245 मेट्रीक टन उसाचे गाळप केले आहे. यातून 67 लाख 8 हजार 205 क्‍विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. जिल्ह्याचा सरासरी उतारा 11.76 इतका आहे. पश्चिम महाराष्ट्रातील साखर कारखान्याच्या दृष्टीने सातारा जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी उतार्‍यात आघाडी घेतली असल्याचे चित्र आहे. 


नेहमीप्रमाणे जिल्ह्यात कृष्णा, सह्याद्री, लो. बा. देसाई, अजिंक्यतारा, रयत, जरंडेश्‍वर या सहा सहकारी साखर कारखान्यांचा उतारा 12 टक्क्यांच्यापुढे गेला आहे. यंदाच्या हंगामात सहकारी कारखान्यांपेक्षा खासगी कारखान्यांनी चांगली कामगिरी केली आहे. सहकारी कारखान्याचे गाळप, उत्पादन व उतारा जास्त आहे. सहकारी व खासगी कारखान्यांची कामगिरी चांगली उल्लेखनीय आहे.


सातारा जिल्ह्यात 14 कारखाने अजूनही पूर्ण क्षमतेने सुरू आहेत. आणखी काही दिवसांमध्ये मोठया प्रमाणात गाळप करून रिकव्हरी वाढण्याची शक्यता आहे. मात्र, काही भागात उसतोडीला जाणीवपूर्वक विलंब लावला जात असल्याने शेतकर्‍यांचे नुकसान होत आहे. ऊस तोडण्यास विलंब झाल्यामुळे शेतकर्‍यांना एकरी सुमारे दोन टनाचा फटका बसत आहे. महापूराच्या पाण्यात भिजून अगोदरच वजन कमी झाले असताना आता तोड न झाल्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त आहे. 


एफआरपी पूर्ण केलेली नाही


आणखी काही दिवस हंगाम चालणार असल्याने रिकव्हरी वाढणार आहे. हंगााम संपत आला तरी काही कारखान्यांनी एफआरपी पूर्ण केलेली नाही. काही कारखाने 2500 रूपयांपर्यंतच अडकले आहेत.