कोरोनाचा बळी पोल्ट्री व्यवसाय 

कोरोनाचा बळी पोल्ट्री व्यवसाय 


 "कोरोना"चा चिकनशी संबंध असल्याच्या भीतीमुळे उध्वस्त झालेल्या पोल्ट्री व्यवसाय खऱ्या अर्थाने "चार आण्याची कोंबडी बाराण्याचा मसाला" सारखीच झाली आहे.पश्चिम महाराष्ट्र व मराठवाड्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील पोल्ट्री व्यवसायिक खचून गेले आहेत. शेतीला पूरक व्यवसाय म्हणून शेतकरी पोल्ट्री व्यवसाय करतात. कोरोनाचा पहिला बळी ठरला तो म्हणजे पोल्ट्री व्यावसाय.कोरोना व्हायरस चिकनमधून पसरत असल्याची अफवा प्रारंभी पसरली. मात्र हे अर्धसत्य असल्याचे स्पष्ट झाल्यानंतरही. चिकन खाणे अनेकांनी बंद केले आहे. लोकांनी चिकन व अंड्यांकडे पाठ फिरविल्याने कोंबडीचे दर ५ ते १० रुपये किलोपर्यंत कोसळले. पोल्ट्री व्यावसायीक शेतकरी संकटात सापडला आहे. १ किलो वजनाची कोंबडी तयार करण्यासाठी ७५ रुपये खर्च येतो. ३ किलो वाढ झालेल्या कोंबडीचा उत्पादन खर्च २१५ रुपये असतो. अशा परिस्थितीत कोंबडीचे दर ५ ते १० रुपये किलोपर्यंत कमी झाल्यामुळे पोल्ट्री व्यवसाय कोलमडला आहे. शेतक-यांवर कोबडी पिल्ले पुरून टाकण्यासारख्या दुर्दैवी घटना घडल्या आहेत. शेती परवडत नाही म्हणून हजारो बेरोजगार शेतकरी तरुणांनी कर्ज काढून पोल्ट्री व्यवसाय सुरु केला. अत्यंत कष्टाने व्यवसायाची घडी बसविली. केवळ एका अफवेने शेतक-यांच्या पोरांनी केलेला पोल्ट्री व्यवसाय उध्वस्त होताना दिसत आहे. पोल्ट्री व्यवसायावर राज्यातील लाखो कुटुंबांचा उदर निर्वाह अवलंबून आहे. पोल्ट्री व्यवसायात कार्यरत असलेले लाखो मजूर, चिकन व अंडी वाहतूक व्यवसायिक, कटिंग, ट्रेडिंग व हॅचरी व्यवसायिक, पोल्ट्री आहार उत्पादक यांचा रोजगार पोल्ट्री व्यवसायावर अवलंबून आहे. कोरोनाचा चुकीचा संबध पोल्ट्री व्यवसायाशी जोडला गेल्यामुळे या सर्वांच्या रोजगारावर कु-हाड कोसळली आहे.मका, सोयाबीन, डी. ओ. सी., राईस पॉलीश, भरड धान्य, तांदूळ यांचा वापर पोल्ट्री आहारात केला जातो. कोंबडीचे दर कोसळल्याने खाद्याचेही दर कमी झाले.अफवा पसरण्यापूर्वी मकाला २२ रुपये किलो दर होता. आता पोल्ट्रीमधील मंदीच्या पार्श्वभूमीवर मकाचे दर १२ रुपये किलोपर्यंत खाली आला आहे. मका, तांदूळ, सोयाबीन व भरड धान्य उत्पादक शेतकरीही यामुळे संकटात सापडला आहे. चिकन किंवा अंडी खाल्ल्याने कोरोना होतो ही अफवा आहे.हे शासकीय स्तरावरून स्पष्ट करण्यासाठी व्यापक मोहीम सुरू आहे. दरम्यान लोकांच्या मनातील चिकनबद्दलची भीती हळूहळू कमी होत आहे.अशा बिकट स्थितीत सापडलेल्या पोल्ट्री व्यवसायिकांची वीज बिल माफ करणे, मोफत वीज पुरविणे, पंचनामे करून नुकसान भरपाईसाठी विचार करणे, कर्जाचे व्याज माफ करणे अशा मागण्या पोल्ट्री व्यवसाय करीत असून करीत आहेत. पोल्ट्री उद्योग सावरण्याच्या असे सकारात्मक सरकारने पावले टाकावे अशी अपेक्षा पोल्ट्री व्यवसायिकांनी व्यक्त केले आहे.