ऊस उत्पादकांचा थकित एफआरपी संदर्भात आंदोलन


ऊस उत्पादकांचा थकित एफआरपी संदर्भात आंदोलन


कराड - बळीराजा शेतकरी संघटनेच्यावतीने सातारा, सांगली , सोलापूर जिल्ह्यातील थकित एफआरपी व त्यावरील व्याज यासंदर्भात साखर संकुल (पुणे - शिवाजीनगर) येथे ठिय्या आंदोलन करण्यात आले. यावेळी कारखानदारांच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या. सहसंचालक व त्यांचे प्रतिनिधी यांच्याशी गेटवर बसून चर्चा करण्यात आली. थकित एफआरपी व त्यावरील व्याज यासंदर्भात बैठकीत चर्चा झाली.


जे कारखानदार एफआरपी व त्यावरील व्याज देत नाहीत अशा कारखान्यावर साखर आयुक्त कारवाई करतात. एफआरपी संदर्भात आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी यांच्याकडे आदेश पाठवण्यात येतो. परंतु जिल्हाधिकारी, तहसीलदार हे राजकीय दबावापोटी आरआरपीची अंमलबजावणी करण्यास जाणून बुजून टाळाटाळ करतात. परिणामी कारखानदारांची मुजोरगिरी वाढते, ते एफआरपी शेतकऱ्यांना देत नाहीत. त्यामुळे शेतकरी अडचणीत येतो आणि आत्महत्या सारखा टोकाचा निर्णय घेतो.


बळीराजा शेतकरी संघटनेच्यावतीने प्रत्येक जिल्हास्तरावर ऊस हंगाम सुरु झाल्यानंतर ऊस हंगाम संपेपर्यंत दोन महिन्यातून एकदा जिल्हाधिकारी कार्यालयात साखर आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी, तहसिलदार, सर्व कारखान्याचे चेअरमन, संचालक, स्थानिक आमदार, शेतकरी संघटनेचे प्रतिनिधी यांची एकत्रित बैठक घ्यावी. यामुळे सर्व समस्यांवर चर्चा होईल. कारखानदारांनी एफआरपी व त्यावरील व्याज शेतकऱ्यांना दिले आहे किंवा नाही याची माहिती मिळू शकेल आणि ज्या कारखान्यानी आरआरसीची कारवाही केली नाही याबाबत निर्णय घेता येईल. 


यामुळे साखर कारखानदारांना शिस्त लागेल. यासंदर्भात मुख्यमंत्री यांची भेट संघटनेचे शिष्टमंडळ घेणार आहे. मुख्यमंत्री व राज्यपाल यांना निवेदन देणार आहे. असे बळीराजा शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष बी. जी. पाटील यांनी सांगितले. याबाबतचे निवेदन साखर आयुक्त यांना देण्यात आले. आंदोलनाला बळीराजा शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष नितीन बागल, सातारा जिल्हा अध्यक्ष साजिद मुल्ला, सांगली जिल्हा अध्यक्ष उन्मेष देशमुख, पुणे जिल्हा अध्यक्ष रमेश गणगे, सोलापूर जिल्हा अध्यक्ष माऊली जवळेकर, पुणे महिला जिल्हा उपाध्यक्ष सुरेखाताई , सातारा जिल्हा उपाध्यक्ष सुनील कोळी, सातारा जिल्हा उपाध्यक्ष सुशांत गोळे, तानाजी सोनवले, पदाधिकारी व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.