बाहेरगांवाहून येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची आरोग्य तपासणी करुन घ्या...गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई 

बाहेरगांवाहून येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची आरोग्य तपासणी करुन घ्या...गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई 


 कराड-  महाराष्ट्र राज्यामध्ये कोरोनो विषाणूचे सुमारे ७५ विषाणू बाधित लोक आढळून आले असून दिवसेंदिवस यामध्ये वाढ होत आहे.त्यामुळे प्रत्येक नागरिकांने स्वत:ची आणि त्यांच्या परिवाराची काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे.पाटण विधानसभा मतदारसंघात मोठया संख्येने नागरिक हे मुंबई, पुणे तसेच बाहेर गांवाहून आपआपल्या गांवी आले आहेत.बाहेरगांवाहून आलेल्या प्रत्येक व्यक्तीची तालुका प्रशासनातील आरोग्य विभागाने तात्काळ आरोग्य तपासणी करुन घ्यावी जेणेकरुन कोणताही धोका निर्माण होणार नाही.अशा सक्त सुचना गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी संबधित अधिकाऱ्यांना दिल्या व बाहेरुन आलेल्या प्रत्येक व्यक्तीने आपली आरोग्य तपासणी तातडीने करुन घ्यावी व आरोग्य विभागाला सहकार्य करावे असे आवाहनही त्यांनी बाहेरगांवाहुन आलेल्या प्रत्येक नागरिकांना केले आहे.


            कोरोनो आजाराचे संसर्ग वाढण्याची शक्यता लक्षात घेवून कालच संपुर्ण देशामध्ये जनता कर्फ्यूचे पालन झालेनंतर सातारा जिल्हयात या पार्श्वभूमिवर कोरोनो विषाणूचा फैलाव वाढू नये याकरीता प्रतिबंधात्मक उपाय म्हणून जिल्हाधिकारी,सातारा यांनी कलम १४४ लागू केले आहे.यासंदर्भात तसेच कोरोनो आजाराच्या दक्षते साठी गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई यांच्या अध्यक्षतेखाली पाटण तहसिल कार्यालय याठिकाणी आज पुन्हा एकदा आढावा बैठक घेण्यात आली.याप्रसंगी त्यांनी वरीलप्रमाणे सुचना केल्या.बैठकीस प्रांताधिकारी श्रीरंग तांबे,तहसिलदार समीर यादव,उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक थोरात,गटविकास अधिकारी मीना साळुंखे,तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.आर.बी.पाटील,पाटण ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉ.चंद्रकांत यादव, सपोनि तृप्ती सोनवणे,पाटण नगरपंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिषेक परदेशी यांची उपस्थिती होती.


        या बैठकीमध्ये गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी प्रांताधिकारी श्रीरंग तांबे यांचेकडून प्रारंभी पाटण मतदारसंघात बाहेरील देशातून,राज्यातून तसेच मुंबई,पुणे शहरातून किती व्यक्ती आल्या आहेत याची माहिती घेतली.यामध्ये बाहेरील देशातून २० तर मुंबई,पुणे या शहरासह इतर शहरातून मोठया प्रमाणांत नागरिक मतदारसंघात आले असल्याची माहिती समोर आली.पाटण मतदारसंघात बाहेरुन मुंबई,पुणे शहरातून येणाऱ्यांची संख्या जास्त आहे.त्यामुळे तालुका प्रशासनाने गांभीर्याने याची काळजी घेणे गरजेचे आहे.


ना.देसाईंनी महसूल विभागाचे मंडलाधिकारी,तलाठी तसेच ग्रामविकास विभागाचे ग्रामसेवक व पोलीस यंत्रणेने संबधित गावचे पोलीस पाटील यांच्यामार्फत त्या त्या गांवामध्ये बाहेरगांवाहून आलेल्या प्रत्येक व्यक्तीची माहिती गोळा करुन टप्प्या टप्प्याने तालुका प्रशासनातील आरोग्य विभागाने अशा व्यक्तींची तात्काळ आरोग्य तपासणी करुन घ्यावी. आशा संव्यसेविका, तसेच आरोग्य विभागाच्या यंत्रणेकडून केवळ बाहेरील व्यक्तींना सर्दी, खोकला आहे का?  अशी विचारणा केली जात आहे या तपासणी बरोबर डिजीटल थर्मामीटरचा वापर करुन अशा व्यक्तींना ताप आहे का याचीही खात्री करुन घ्यावी. गत १५ दिवसात बाहेरील गांवाहून आलेल्या प्रत्येक नागरिकांने आपल्या स्वत:च्या व गावांतील इतरांच्या आरोग्यासाठी जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात जावून आपली तपासणी करुन घ्यावी.


आरोग्य विभागाला तसेच तालुका प्रशासनाला सहकार्य करावे. आपली स्वत:ची व आपल्या परिवाराची तसेच गावातील नागरिेकांची काळजी घेणे हे आपले आद्य कर्तव्य आहे अद्यापपर्यंत पाटण मतदारसंघात कोणाही व्यक्तीमध्ये कोरोनो विषाणू बाधितची काही लक्षणे आढळून आली नाहीत ही बाब आनंदाची असल्याचे सांगून त्यांनी महसूल यंत्रणेमार्फत मंडलाधिकारी,तलाठी,कोतवाल तसेच पंचायत समितीमार्फत विस्तार अधिकारी,ग्रामसेवक,पोलीस यंत्रणेमार्फत पोलीस पाटील यांना गावा गांवामध्ये जावून जनजागृती करण्याच्या सुचना त्यांनी यावेळी केल्या तसेच कालच संपुर्ण देशामध्ये जनता कर्फ्यूचे पालन झाले मात्र आज मोठया प्रमाणात लोक रस्त्यावर आहेत.


या पार्श्वभूमिवर जिल्हाधिकारी,सातारा यांनी संपुर्ण सातारा जिल्हयामध्ये कलम १४४ लागू केले आहे. पाटण मतदारसंघातील सर्व पोलीस स्टेशनच्या यंत्रणांनी तसेच ग्रामसेवकांनी सतर्क राहून ५ पेक्षा अधिक लोक एकत्र येणार नाहीत याकरीता गावोगांवी ग्रामपंचायतीच्या कार्यालयातून स्पीकरव्दारे आवाहन करावे. अशा सुचना उपविभागीय पोलीस अधिकारी व गटविकास अधिकारी यांना केल्या.अत्यावश्यक सेवेमध्ये हॉस्पीटल,मेडीकल, अन्न, दुध, फळे,भाजीपाला व किराणा घेणेकरीता मोठया प्रमाणात गर्दी होत आहे तसेच दुचाकीवरुन युवकही मोठया प्रमाणावर रस्त्यावर फिरताना दिसत आहेत यावर नियंत्रण आणणे गरजेचे आहे त्याकरीता अत्यावश्यक सेवेमध्ये हॉस्पीटल,मेडीकल यांच्या व्यतिरिक्त दुध,फळे, भाजीपाला व किराणा आणणेकरीता नागरिकांना सकाळची वेळ ठरवून देणेबाबतही सुचना करण्यात याव्यात याकरीता जिल्हाधिकारी,सातारा यांना सुचित करणार असल्याचेही त्यांनी शेवठी बैठकीत सांगितले.