हीरक महोत्सवी महाराष्ट्र - नागरी स्वछता अभियान १ मार्च ते ३० एप्रिल कालावधीत राबवण्याच्या सूचना


हीरक महोत्सवी महाराष्ट्र - नागरी स्वछता अभियान
१ मार्च ते ३० एप्रिल कालावधीत राबवण्याच्या सूचना


(गोरख तावरे)


कराड - केंद्र शासनाने सुरू केलेल्या स्वच्छ सर्वेक्षण अभियानाप्रमाणेच महाविकास आघाडी सरकारने राज्यातील सर्व नागरी स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये "हीरक महोत्सवी महाराष्ट्र - नागरी स्वछता अभियान" याची अंमलबजावणी करण्याबाबत सूचना निर्गमित केल्या आहेत. केंद्राच्या धर्तीवर राज्यातही स्वच्छ सर्वेक्षण अभियानाचे अध्यादेश पारित करण्यात आला आहे. या अभियानामध्ये नागरिक व लोकप्रतिनिधींना सहभागी करून घ्यावे. त्याचबरोबर दोन महिन्याच्या कालावधीमध्ये आपल्या शहरांमध्ये हे अभियान प्रभावीपणे राबवण्यात यावे असे निर्देश देण्यात आलेले आहेत.


मुख्यमंत्री श्री उद्धव ठाकरे व नगर विकासमंत्री एकनाथ शिंदे यांचे राज्यातील शहरांबाबत जे Vision आहे. त्यानुसार राज्याच्या हीरक महोत्सवानिमित्त हे अभियानाची प्रभावीपणे अंमलबजावणी राज्यातील सर्व शहरांमध्ये दिनांक १ मार्च ते ३० एप्रिल २०२० या दोन महिन्याच्या कालवधीत करण्यात येणार आहे. सांगतां कार्यक्रम महाराष्ट्र राज्याच्या हीरक महोत्सवीदिनी म्हणजे १ मे २०२० रोजी करण्यात येणार आहे.


या अभियानाचा शासन निर्णय व अंमलबाजावणी व शहरांच्या तपासणी बाबतच्या प्रारूप आणि मार्गदर्शक सूचनाही शासन आदेशात स्पष्ट करण्यात आले आहेत. या प्रारूप मार्गदर्शक सूचनांच्या अनुषंगाने काही सूचना / अभिप्राय असल्यास त्या राज्य अभियान संचलनालयास ४ मार्च २०२० पर्यंत पाठविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


अशा आहेत मार्गदर्शक सूचना ? 


“हीरक महोत्सवी महाराष्ट्र - नागरी स्वच्छता अभियान” राज्यामधील प्रत्येक शहरात राबविण्यात येत आहे.
शहरातील घनकचऱ्याचे व्यवस्थापन करणे, शहरात निर्माण होणाऱ्या घनकचऱ्याचे 100% संकलन करणे, घनकचऱ्याचे विलगीकरणाचे प्रमाण वाढवणे, विलगीकरण कचर्‍यावर 100% प्रक्रिया करणे, जुन्या साठवलेल्या कचऱ्यावर बायोमाइनिंग करणे, बाांधकाम आणि पाडकाम कचरा, रस्त्याची सुधारणा व, सौंदर्यीकरण पदपथांची सुधारणा व सौंदर्यीकरण, वाहतूक बेटे व दुभाजकांचे सौंदर्यीकरण, शहरातील उड्डानपुलांचे सौंदर्यीकरण, उद्यानांचे सौंदर्यीकरण, फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी, शहरातील नाल्यांची सफाई करणे, सर्वसाधारण स्वच्छता, संबंधित शहरांसाठी समान वैशिष्ट्यपूर्ण डिझाईन तयार करणे अशा मार्गदर्शक सूचना करण्यात आल्या आहेत.


कोणता निधी वापरायचा ?


14 व्या वित्त आयोगाच्या निधीपैकी स्वच्छ भारत अभियानासाठी राखून ठेवलेल्या 50% निधी मधून या हीरक महोत्सवी महाराष्ट्र - नागरी स्वच्छता अभियानाच्या कालावधीत करण्यात येणाऱ्या कामाांवर खर्च करता येईल. अमृत अभियान अंतर्गत राज्यास केंद्रशासनाकडून प्रोत्साहन अनुदान मिळाले आहे. त्या निधीचि वापर अमृत शहरांना करता येईल. असेही अध्यादेशात म्हटले आहे. 


अभियानाच्या कामाचे मूल्यांकन होणार


या अभियानात संबंधित नागरी स्थानिक स्वराज्य संस्थेने केलेल्या कामाचे मूल्यांकन 1 मे 2020 नंतर राज्य शासनाने नियुक्त केलेल्या त्रयस्थ यंत्रणेमार्फत मार्फत करण्यात येणार आहे. याचा निकाल जून 2020 रोजी जाहीर करण्यात येईल. चांगली कामगिरी करणाऱ्या नागरी स्थानिक स्वराज्य संस्थेला बक्षीस देण्यात येणार आहे.