विकाससेवा सोसायटीच्या माध्यमातून शेतकरी हित साधा आ. शिवेंद्रसिंहराजे......कारी सोसायटीची निवडणूक बिनविरोध
सातारा- आपल्या भारत देशाच्या अन्नसाखळीचा कणा असलेल्या शेतकर्यांना आर्थिक पाठबळ मिळण्यासाठी गावोगावी विकाससेवा सोसायट्यांचे जाळे निर्माण करण्यात आले आहे. या संस्थांच्या माध्यमातून शेतकर्यांना आर्थिक उन्नतीकडे नेण्याचे काम सोसायटीच्या पदाधिकार्यांनी केले पाहिजे. कारी विकास सेवा सोसायटीच्या नूतन पदाधिकार्यांनी शेतकर्यांचे हित जोपासून संस्थेचा नावलौकिक वाढवावा, असे आवाहन सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केले.
सातारा तालुक्यातील कारी येथील विकास सेवा सोसायटीची निवडणूक बिनविरोध पार पडली. सोसायटीवर आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले गटाने एकहाती सत्ता मिळवली. चेअरमनपदी पोपट शंकर जिमन तर, व्हा. चेअरमनपदी पार्वती जगन्नाथ पिंपळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. नूतन पदाधिकारी आणि काशिनाथ मोरे, काशिनाथ श्रीपती मोरे, लक्ष्मण मोरे, बाळू मोरे, भानुदास अडागळे, चंद्रकांत राऊत, सुरेश मोरे, मोहन मोरे, फुलाबाई मोरे, संजय फडतरे या सदस्यांचा सत्कार आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी सत्कार करुन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी ते बोलत होते. यावेळी कारी गावाचे सरपंच, सर्व सदस्य आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
आ. शिवेंद्रसिंहराजे म्हणाले की, जगाचा पोशिंदा असलेल्या शेतकर्याला शेतीसाठी लागणारे आर्थिक पाटबळ विकाससेवा सोसायट्यांमुळे मिळत असते. सभासद शेतकर्यांना वेळेला आर्थिक पुरवठा करुन सोसायट्यांनी शेतकर्यांच्या अडचणी दूर कराव्यात. सोसायट्यांमुळेच शेतकर्यांना बी, बीयाणे, खते, तण आणि किटकनशके आदींसाठी पैसे मिळत असतात. याशिवाय जिल्हा बँकेच्या विविध योजनांचा लाभ घेता यावा, यासाठीही सोसायट्यांनी शेतकर्यांना सहकार्य करुन आपल्या गावातील शेतकरी सक्षम केला पाहिजे. त्यामुळे खेड सोसायटीच्या पदाधिकार्यांनी सोसायटीच्या माध्यमातून सभासद शेतकर्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी यावेळी केले