पॅकेजचे लाभ जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी सर्व शक्तिनिशी प्रयत्न करणार....संकटाचे वळण लक्षात घेऊन वेळोवेळी नवे पॅकेज हवे - अजित पवार


पॅकेजचे लाभ जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी सर्व शक्तिनिशी प्रयत्न करणार....संकटाचे वळण लक्षात घेऊन वेळोवेळी नवे पॅकेज हवे - अजित पवार


मुंबई : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 1 लाख 70 हजार कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केल्याच्या निर्णयाचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वागत केले आहे. महाराष्ट्र व देशासमोरचे करोनाचे भीषण संकट लक्षात घेता केंद्र सरकारकडून अशा पॅकेजची गरज होती. या पॅकेजचे लाभ गरजूंपर्यंत पोहचवण्यासाठी राज्य शासन सर्व शक्तीनिशी प्रयत्न करेल, असे त्यांनी सांगितले आहे. 


करोनाच्या संकटाची भीषणता पाहता केंद्रीय अर्थमंत्र्यांनी जाहीर केलेले 1 कोटी 70 लाख रुपयांचे पॅकेज हे सुरुवातीच्या पहिल्या टप्प्यासाठी आहे, असे मी मानतो. यापुढच्या काळात संकट कसे वळण घेते याचा नियमित आढावा घेऊन वेळोवेळी नवे पॅकज जाहीर होण्याची गरज आहे, अशी अपेक्षा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केली आहे. प्रधानमंत्री अन्न कल्याण योजना आणि डीबीटी अशा दोन माध्यमांद्वारे जनतेला मदत मिळणार आहे. करोनाचे संकट हे तीन महिन्यांसाठी चालेल हे गृहीत धरुन हे पॅकेज तयार केले असले तरी त्याचे वितरण तात्काळ होणे अपेक्षित आहे. राज्यात व देशात तत्काळ आरोग्यसुविधा उभारण्यासाठी स्वतंत्र निधी उपलब्ध झाला पाहिजे, अशी मागणीही अजित पवार यांनी केली आहे.