कराडमध्ये भाजीपाला विक्री, किराणा दुकानात सोशल डिस्टस्निंगचा प्रयोग...मुख्याधिकारी यशवंत डांगे यांची माहिती


कराडमध्ये भाजीपाला विक्री, किराणा दुकानात सोशल डिस्टस्निंगचा प्रयोग...मुख्याधिकारी यशवंत डांगे यांची माहिती


कराड - कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी देशभरात लोक डाऊन करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर कराड शहरात जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी दुकानांमध्ये गर्दी होऊ नये, यासाठी सोशल डिस्टस्निंगचा प्रयोग राबविण्यास नगरपालिकेने सुरुवात केल्याची माहिती मुख्याधिकारी यशवंत डांगे यांनी दिली. कराडकर नागरिकांना अन्नधान्य, भाजीपाला यांची कोणतीही टंचाई भासू देणार नाही नागरिकांनी कृपया दुकानांमध्ये खरेदीसाठी गर्दी करु नये, असे आवाहन डांगे यांनी केले आहे.


कराड नगरपरिषद राबवत असलेल्या उपाययोजनांची माहिती देताना मुख्याधिकारी यशवंत डांगे म्हणाले की, शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी भाजी मंडई असून तेथे होणारी गर्दी टाळणे महत्त्वाचे होते. यासाठी शहरात विकेंद्रित पद्धतीने भाजीपाला विक्रीची केंद्र सुरू करण्याचा निर्णय नगरपालिकेने घेतला आहे. यातील पहिले केंद्र कृष्णा नाक्यावर सुरू केले आहे. याबरोबरच शहराच्या अन्य भागातही भाजीपाला विक्री केंद्र सुरू होणार आहे. या बरोबरच फळे, कांदे-बटाटे हेही रहिवाशांना त्यांच्या भागात मिळण्याची सोय नगरपालिका करणार आहे. यासाठी फिरत्या विक्रीची मदत घेतली जाणार आहे. भाजीपाला खरेदी करताना दोन व्यापाऱ्यांमध्ये तसेच दोन ग्राहकांमध्ये किमान एक मीटरचे अंतर ठेवण्याचा निकष नगरपालिकेने लागू केला आहे. त्यानुसार मंडई व अन्य ठिकाणी भाजीपाला विक्री केंद्राच्यासमोर रेषांची आखणी केली आहे.


किराणा मालाची टंचाई भासू नये , यासाठी शहरातील व्यापाऱ्यांना व्हाट्सअप द्वारे होम डिलिव्हरी देण्याबाबत सूचना केल्या आहेत. यास किराणा व्यापार यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. किराणा दुकानासमोरही खरेदीवेळी सोशल डिस्टस्निंग ठेवण्याबाबत सूचना केल्या आहेत. नगरपालिका कर्मचाऱ्यांनी प्रत्येक दुकानासमोर एक मीटर अंतरावर रेषांची आखणी केली आहे. त्या रेषांमध्ये उभे राहून तसेच प्रत्येक वेळी दुकानात एका ग्राहकाला प्रवेश या धर्तीवर खरेदी सुरू ठेवण्याचे आदेश दिले आहेत.


दुकानदारांना साहित्य विकतांना त्यांच्याकडील कामगार व हमाल हे दुकानापर्यंत येण्यास अडचण येत असल्याच्या तक्रारी आहेत. या पार्श्वभूमीवर दुकानातील हमाल व कामगार यांना पास देता येतील का, याची चर्चा सुरू आहे. कराडमध्ये भाजीपाला उपलब्ध असला तरी बाजार समितीच्या माध्यमातून नव्या शेतमालाची आवक होणे गरजेचे आहे. यासाठी घाऊक व किरकोळ शेतक-यांशी चर्चा केली असून तालुक्यातून येणारा होलसेल शेतमाल पोलिसांच्या मदतीने करण्यात यावा, या दृष्टीनेही पोलिसांशी तसेच व्यापाऱ्यांशी चर्चा झाली असल्याचे त्यांनी सांगितले.


शहरात नगरपालिकेतर्फे निर्जंतुकीकरण मोहीम युद्धपातळीवर सुरू आहे. होम टू होम तपासणी सुरू असून आवश्यक तिथे लोकांना कोरंटाईन केले आहे नागरिकांनी घाबरून जाऊ नये. जीवनावश्यक वस्तूंची कोणतीही टंचाई शहरात भासू देणार नाही, असे मुख्याधिकारी त्यांनी सांगितले.