कोरोनाच्या संकट काळात सातारचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांचा कौतुकास्पद निर्णय


कोरोनाच्या संकट काळात सातारचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांचा कौतुकास्पद निर्णय


कराड - राज्याचे सहकार व पणन मंत्री तसेच सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार बाळासाहेब पाटील यांनी कोरोना संकटाला तोंड देताना जनतेला संयम राखण्याचे आवाहन केले आहे. या बरोबरच आपल्या शासकीय ताफ्यात असणारी वाहने व पोलीस कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त कमी करत त्यांना मदत कार्यात सहभागी होण्याच्या सूचना देत कौतुकास्पद निर्णय घेतला आहे. 


महाराष्ट्र शासन कोरोना आपत्तीचा सामना करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करत आहे. सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार बाळासाहेब पाटील हेही मुंबई, सातारा, कराड या ठिकाणी वेळ देत प्रशासनाकडून आढावा घेत उपाययोजनाबाबत सूचना करत आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संपूर्ण राज्यभरात संचारबंदी व जमावबंदी लागू केली आहे. या पार्श्वभूमीवर नामदार बाळासाहेब पाटील यांनी स्वतःच्या शासकीय ताफ्यातील असणाऱ्या वाहनांची संख्या तसेच पोलीस कर्मचाऱ्यांची संख्या कमी केली आहे. 


सातारा जिल्ह्यात पालकमंत्र्यांना किमान दहा पोलिसांचा बंदोबस्त असतो. याशिवाय पायलट, एस्कॉर्ट आणि डी. व्ही. कार अशी तीन वाहने त्यांच्या दिमतीला असतात. यातील दोन वाहनांसह किमान सात कर्मचार्‍यांचा पोलीस बंदोबस्त पालकमंत्र्यांनी कमी करत त्यांना कोरोना आपदग्रस्तांच्या मदतीसाठी शासन करत असलेल्या उपाययोजनांमध्ये सहभागी होण्याचे आवाहन पालकमंत्र्यांनी केले आहे. पालकमंत्री नामदार बाळासाहेब पाटील यांच्या या निर्णयाचे सर्वत्र कौतुक होत आहे.