ग्राम सुरक्षा यंत्रणा कार्यान्वित करणारी मसूर ग्रामपंचायत प्रथम


ग्राम सुरक्षा यंत्रणा कार्यान्वित करणारी मसूर ग्रामपंचायत प्रथम


कराड - सातारा जिल्ह्यात सर्वप्रथम मसूर गावामध्ये ग्रामपंचायतीच्या माध्यमातून ग्राम सुरक्षा यंत्रणा कार्यान्वित केली आहे. ही यंत्रणा सर्वोत्तम आपत्कालीन संपर्क यंत्रणा आहे. अशी माहिती मसुल ग्रामपंचायतीचे सरपंच पंकज दीक्षित यांनी दिली.


ग्राम सुरक्षा यंत्रणेबाबत अधिक माहिती देताना सरपंच पंकज दीक्षित म्हणाले की, संकट काळामध्ये म्हणजे आग, चोरी, दरोडा, लहान मूल हरवणे, महिलांची छेडछाड, वाहनचोरी, शेतातील पिकांची चोरी, शेतातील पिकांना आग, गंभीर अपघात, वन्यप्राणी, बिबट्या, तरस लांडगा यांचा हल्ला, पूर परिस्थिती आदि घटनांमध्ये तातडीने जवळपास असणाऱ्या नागरिकांशी तात्काळ संपर्क साधून मदत मागण्यासाठी मसूर ग्रामपंचायती मार्फत ग्राम सुरक्षा यंत्रणा सुरू करण्यात आली आहे. ग्राम सुरक्षा यंत्रणा राबवणारे सातारा जिल्ह्यातील मसूर ग्रामपंचायत ही प्रथम आहे.


या यंत्रणेत नोंदणी केलेल्या नागरिकाने संकट काळात फोन केल्यास त्याचा आवाज परिसरातील हजारो नागरिकांना त्वरित मोबाईलवर ऐकू जातो. परिसरातील नागरिकांना घटना घडत असताना तिची माहिती मिळाल्याने तातडीने मदत करणे व नुकसान टाळणे शक्‍य होते. याचा सर्वांगीण विचार करून जिल्हा परिषदेचे शिक्षण समिऊ सभापती मानसिंगराव जगदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली मसूर ग्रामपंचायतीने जिल्हा सर्वप्रथम ही यंत्रणा कार्यान्वित केले आहे असेही सरपंच पंकज दीक्षित यांनी सांगितले.


या यंत्रणेची वैशिष्ट्ये : घटना ग्रस्त नागरिकांना परिसरातील नागरिकांची तातडीने मदत मिळते, गावातील कार्यक्रम किंवा घटना विनाविलंब ग्रामस्थांना एकाच वेळी कळतात, अफवांवर आळा घालणे शक्य होते, प्रशासनाला नागरिकांशी जलद संवाद साधता येतो, पोलीस यंत्रणेस कायदा सुव्यवस्था कायम राखणे कामी नागरिकांचे सहकार्य मिळते, संपूर्ण स्वयंचलित यंत्रणा, गावासाठी यंत्रणा सुरू करणे व सहभागी होण्यासाठी सोपी पद्धत, यंत्रणेत सहभागी असलेला कोणताही नागरिक आपत्ती काळात संपूर्ण परिसराला सावध करू शकतो, संदेश देणाऱ्या व्यक्तीच्या आवाजातच संदेश कॉल स्वरूपात नागरिकांना मिळतो, दुर्घटनेचे स्वरूप तीव्रता, ठिकाण कळल्याने गावकऱ्यांना विनाविलंब व नियोजनबद्ध मदत करता येते, नियमानुसार दिलेले संदेश स्वयंचलितरित्या प्रसारित होतात, नियमबाह्य दिलेले संदेश किंवा अपूर्ण संदेश रद्द होतात व प्रसारित होत नाहीत, एका गावात चोरी करून चोर दुसऱ्या गावच्या दिशेने गेल्यास त्या गावालाही सावध करणे शक्य, वाहतुकीचा संदेश आजूबाजूच्या दहा किलोमीटर परिसरातील सर्व गावाच्या दिशांना तात्काळ मिळतो , घटनेच्या तीव्रतेनुसार कॉल रिसीव होत नाही तोपर्यंत रिंग वाजते, संदेश पुढील एक तास पुन्हा पुन्हा ऐकण्याची सोय, कोणत्याही वेळी आपल्यासाठी संदेश तपासणीची सोय, चुकीचा संदेश किंवा मिस कॉल देणारे नंबर आपोआप ब्लॅकलिस्ट होतात, गावाबाहेर दुसऱ्या गावात अपघातग्रस्त नागरिकांना संदेश घटना घडल्या परिसरातील प्रसारित होतात, या यंत्रणेस 24तास केव्हाही कॉल करू शकता वेळेचे कोणतेही बंधन नाही, ग्राम सुरक्षा यंत्रणा आपत्कालीन वापरासाठी असल्याने 24 तास 365 दिवस कार्यरत असते व शासकीय सुटीच्या दिवशी कामकाज सुरू असते