कोरोना साथी विरोधात नरेंद्र मोदी यांचा टाळी, थाळी आणि दिवाळी कार्यक्रम दुर्दैवी - आ. पृथ्वीराज चव्हाण


कोरोना साथी विरोधात नरेंद्र मोदी यांचा टाळी, थाळी आणि दिवाळी कार्यक्रम दुर्दैवी - आ. पृथ्वीराज चव्हाण


कराड : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज पुन्हा एकदा टीव्हीसमोर येऊन स्वगत व्यक्त करताना ०५ एप्रिल रोजी रात्री ९ वाजता सर्व भारतीयांनी घरात अंधार करून दिवे लावण्याचे आवाहन केले आहे. मागील १५ दिवसाच्या कालावधीत प्रधानमंत्री मोदी यांचे हे तिसरे भाषण असून प्रत्येकवेळी कोरोना विषाणूच्या विरोधात काहीतरी नवीन जुमला लोकांसमोर मांडण्याचा त्यांचा प्रयत्न दिसतोय. 


आज सकाळी देशाला उद्देशून केलेल्या भाषणात त्यांनी कोरोना संसर्गाविषयीचे आकडे, आरोग्य व्यवस्थेची तयारी, लाखो स्थलांतरित मजुरांचा गंभीर प्रश्न, अर्थव्यवस्था ठप्प झाल्याने रोजगारावर होणारे परिणाम या सर्व मुद्द्यांना स्पर्श न करता दिवे लावण्याचे आवाहन केले. 


कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या गंभीर परिस्थीतीचा सामना करताना आपले प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी हे एकमेव जागतिक नेते (राष्ट्रप्रमुख किंवा शासन-प्रमुख) आहेत की ज्यांनी आतापर्यंत एकही पत्रकार परिषद घेतली नाही. अमेरिकेचे राष्ट्रपति डोनाल्ड ट्रंप यांनी ०१ ते ३१ मार्च या कालावधीत २८ तर युकेचे प्रधानमंत्री बोरिस जॉन्सन यांनी आजारी पडण्याआधी १८ पत्रकार परिषदा घेऊन पत्रकारांच्या प्रश्नांना म्हणजेच पत्रकारांच्या माध्यमातून आलेल्या जनतेच्या प्रश्नांना नियमितपणे सामोरे गेले आहेत. 


देश एवढ्या गंभीर परिस्थितीतून जात असतानादेखील कार्यालयात बसून अधिकाऱ्यांनी लिहून दिलेले भाषण वाचून एकतर्फी संवाद (monologue) साधण्यापेक्षा पत्रकार परिषद घेउन देशवासीयांना आश्वस्त करण्याऐवजी त्यांनी टाळी, थाळी आणि आता दिवाळी अशी त्रिसूत्री लोकांसमोर मांडली आहे हे अतिशय दुर्दैवी आहे.