पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या आवाहनानुसार वनवासमाची येथे अन्नधान्याचे वाटप


पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या आवाहनानुसार वनवासमाची येथे अन्नधान्याचे वाटप


कराड : कोरोनाचे संकटामुळे कराड तालुक्यातील वनवासमाची गावात अचानक उदभवलेल्या आपत्तीमुळे येथील अनेकांची मोठी गैरसोय झाली. ही परिस्थिती हाताळण्यासाठी प्रशासन सतर्कतेने प्रयत्न करत आहे. वनवासमाचीत अचानक उदभवलेल्या या परिस्थितीमुळे अनेकांवर उपासमारीची वेळ आली होती. त्यामुळे 
महाराष्ट्र राज्याचे सहकार व पणन मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार बाळासाहेब पाटील यांनी सामाजिक बांधिलकीतून वनवासमाची परिसरातील गोरगरीब व गरजूंना जीवनावश्यक वस्तू देऊन मदतीचा हात द्यावा असे आवाहन केले होते. 


नामदार पाटील साहेब यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत वनवासमाची परिसरातील प्रमुख कार्यकर्त्यांनी एकत्रित येऊन जीवनावश्यक वस्तूंचे कीट देण्याचे नियोजन केले. त्यानुसार त्यांनी आज (बुधवारी) सकाळी दहा वाजता सह्याद्रीचे संचालक मा. माणिकराव पाटील (दादा) यांच्या हस्ते उंब्रजचे वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय कुंभार, ग्रामसेविका जाधव मॅडम यांच्याकडे सुमारे 175 लोकांसाठी हे जीवनावश्यक वस्तूंचे कीट सुपूर्द केले. 


यावेळी पंचायत समिती सभापती प्रणव ताटे, अधिक पवार-गोटेकर, तलाठी कुलकर्णी, धनाजी जाधव, तुषार पवार आदी उपस्थित होते. या जीवनावश्यक कीटमध्ये गहू, साखर, चहा पावडर, रवा, चटणी, खाद्यतेल, तूरडाळ, मूगडाळ, मीठ, पॅराशूट तेल, अंघोळीचे व कपड्यांचे साबण या वस्तूंचा समावेश आहे.


वनवासमाची गावातील परिस्थिती नियंत्रणासाठी संबंधित प्रशासन काम करीत आहे. लवकरच ही परिस्थिती आटोक्यात येईल. मात्र ग्रामस्थांनी गावच्या हितासाठी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करुन प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन मा. माणिकराव पाटील यांनी यावेळी केले.